5 सप्टेंबर पासून औरंगाबाद ते मुंबई शिक्षक काढणार पायी दिंडी – आमदार बाळाराम पाटील
जयभिम महाराष्ट्र – राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी कोकण विभाग शिक्षक आमदार माननीय श्री बाळाराम पाटील यांनी केली आहे
Covid-19 संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर दिसून आलेल्या प्रतिकूल परिणामांमुळे वित्तीय उपाययोजना म्हणून दिनांक ०५ मे २०२० पासून नवीन पदभरतीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात पदभरतीसाठी लादलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा
जेंव्हा एक दलित मुलगी फुल तोडते..!! तेंव्हा काय घडते?
पवित्र पोर्टल मार्फत करण्यात आलेली शिक्षक भरती मागील ३ वर्षांपासून रखडलेली असून १२१४७ जागांपैकी जवळपास ६३०० पदे अजून भरावयाच्या बाकी आहेत. भरती बंद असल्याने शिक्षक उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. तरी सदर पदभरती प्रक्रियेला विशेष सूट देऊन उमेदवार शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा सदरील उमेदवार 5 सप्टेंबर पासुन कोरोच्या काळात देखील औरंगाबाद ते मुंबई अशी पायी दिंडी काढणार आहेत. त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्नशील असून माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिल्याचे श्री.बाळाराम पाटील यांनी सांगितले.